भंडारा दर्पण/प्रतिनिधी
भंडारा : लग्न आटोपून स्व:गावी परत येत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पती-पत्नीसह ५ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी (२१ एप्रिल) मध्यरात्री तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, चिखला (माईन) येथील कैलाश मरकाम त्याची पत्नी पार्वता व शेजारी राहणाऱ्या सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षाची मुलगी यामीनी कंगाली हे चौघे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न कार्य पार पडल्यावर ते रात्री स्वगावी परतत असताना रामनगरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
नाकाडोंगरी जवळील चांदमारा येथे लग्नकार्य असल्याने मध्यप्रदेशातील हेटी येथून बोलेरो वाहन वरात घेऊन आले होते. माहितीप्रमाणे, चालक दिनेश गौपाले याने लोभीजवळ एका व्यक्तीला धडक दिली. यामुळे चालक गोंधळून सुसाट मध्यप्रदेशकडे निघाला. यातचं रामनगर जवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.
या भीषण अपघातात कैलास मरकाम (४२), पार्वता मरकाम (३६), यामिनी कंगाली (५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली (३०) गंभीर जखमी असून तिला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याची माहिती आहे.
फिर्यादी विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते, पोलीस हवालदार मंगेश पेंदाम तपास करीत आहेत. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिखला गावात शोककळा पसरली आहे.
